राज्यभरातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सदर मागणी करीत आहे.
बुलढाणा न्युज : भरतीपूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाइन पद्धतीने एमपीएससी यंत्रणे अंतर्गतच घेण्यात यावी. शासन निर्णयानुसार स्थानिक परीक्षा केंद्रांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तर वादग्रस्त ठरलेल्या खासगी कंपनी मार्फत परीक्षा न घेता एमपीएससी प्रशासकीय यंत्रणेमार्फतच ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी करीत आहे.
या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा मुख्य गृहसचिव यांना निवेदन सादर करीत सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती अध्यक्ष सचिव भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी संघटना बुलढाणा, ज्ञानेश्वर अण्णा दळवी प्रदेश अध्यक्ष आझाद हिंद विद्यार्थी संघटना पूणे,जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद आहे की, कायदा व सुव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पोलीस खात्यातील गोपनीयता व विश्वासाहर्ता अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस भरती परीक्षा विश्वासहर्ता गमावलेल्या कंपन्याकडून न घेता शासनाच्या एमपीएससी प्रशासकीय यंत्रणेमार्फतच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी.
दि.31 जानेवारी 2024 रोजीचा शासन निर्णय क्र पोलीस- 1124/प्र. क. 02/पोल 5 अ सन 2022 व 2023 या वर्षातील पोलीस दलातील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सहस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण 17,471 पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेतील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ( Computer Programme Based Test / Examination) किंवा OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास असणार आहे. राज्यात पोलीस भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांची संख्या बहुसंख्य आहे. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असंख्य आवाहनांना सामोरे जावे लागते. सद्याच्या घडीला देखील ग्रामीण परिसरात आधुनिक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना संगणकावर वर परीक्षेचा सराव करणे शक्य नाही.
तसेच कर्मचार्यांनी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणे, विविध परीक्षेमध्ये पेपर फूटी, यासह विविध परीक्षेंमध्ये घोटाळा झाल्याचा पूर्व इतिहास आहे.
या अनुषंगाने विविध वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांची विश्वासाहर्ता कमी झालेली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्याही खाजगी कंपनीला न देता ती केवळ सरकारी यंत्रणे मार्फतच घेण्यात यावी. दि.21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा TCS व IBPS या कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय सुद्धा आमच्यावर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द न केल्यास महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होणार्या सुरक्षारक्षकांचे मनोबल खच्चीकरण होईल.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद अबाधित ठेवण्यासाठी, शासन प्रशासनावरील विश्वासाहर्ता कायम ठेवण्यासाठी सहानुभूतिपूर्वक विचार करून पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही पूर्वी प्रमाणेच ऑफलाईन प्रशासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आली आहे.