आमदार संजय गायकवाड यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा न्यूज- सोमवारी , 26 फेब्रुवारी रोजी रात्री जिल्हाभरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे बुलढाणा मतदारसंघातील मोताळा व बुलढाणा तालुक्यात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर झाडला असून संत्रा पिके देखील उध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांचा तात्काळ सर्वे करण्यात यावा, अशी मागणी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मंगळवारी 27 फेब्रुवारी निवेदन देण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेला आहे. शेतकर्याच्या उत्पादनास भाव नसल्याने तो डबघाईस आहे. तसेच कोरोना काळापासून संकटात अडकलेल्या शेतकरी आता कुठे मोकळा श्वास घेऊ पाहत होता. मात्र पर्यावरणाने त्याच्या तोंडी आलेला हा घास सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी रात्री हिरावून घेतला. सायंकाळपासूनच आकाशात दाटून आलेल्या ढगांनी सात वाजेपासून अवकाळी पावसाची सुरुवात झाली होती. जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली. सदर अवकाळी पाऊस हा रात्री उशिरापर्यंत सलग सुरूच होता. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याभरातील गहू, हरभरा नुकसान झाले तर दुसरीकडे आंब्याचा मोहोर पपई, संत्रा, मोसंबी, द्राक्ष या फळबाग उत्पादकास प्रचंड नुकसान सोसावा लागत आहे . त्यामुळे सदर शेतकर्यांचे तात्काळ सर्वेक्षण करण्यात यावे व शासनाच्या वतीने मदत जाहीर करावी, अशी मागणी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एकूण 823 गावातील 44 हजार 579 हेक्टरवर शेती पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात 21 हजार 768 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची नुकसानीची प्राथमिक आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली. यामुळे हातातोंडाशी आलेले हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.