बुलडाणा
डॉ. जयंत नारळीकरांचे आकाश संशोधन आणि साहित्यातील अमूल्य योगदानामुळे मराठी साहित्याला एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला. त्यामुळे मराठी साहित्य अधिक प्रगल्भ झाले असे मत बुलढाणा येथील खगोलशास्त्राचे अभ्यासक अनिल दातीर यांनी प्रगती वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून केले. त्यांनी डॉ.नारळीकरांच्या सहवासा विषयी असलेल्या आपल्या आठवणी व आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रगती वाचनालयाच्या वतीने दिनांक २३ मे २०२५ रोजी वाचनालयाच्या सभागृहात प्रा. डॉ. कि. वा. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्या संस्था व संघटनेच्यावतीने डॉ जयंत नारळीकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रगती वाचनालय आणि जयंत नारळीकर यांचे एक वैचारिक ॠणानुबंध आहेत. २३ नोव्हेंबर २००० रोजी प्रा.डॉ.स.त्र्य. कुल्ली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रगती व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. नारळीकरांच्या शुभहस्ते झाले होते. डॉ. जयंत नारळीकरांनी आयुष्यभर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काम केले. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक आणि साहित्यिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे मत प्रा. डॉ. कि. वा. वाघ यांनी आपली श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. मनोहर तुपकर, प्रा. रवींद्र साळवे, पत्रकार राजेंद्र काळे, दिनकर चिंचोले, प्रेषित सिद्धपट्टी, इंजिनीयर सुरेश चौधरी, पाली भाषेचे अभ्यासक दयानंद मिसाळकर, यांनीही आपल्या श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकिरण टाकळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांनी केले.या श्रध्दांजली सभेला कर्नल सुहास जतकर,युवराज कापरे, अनिता कापरे, शिवाजी गवई, विजय बावस्कर,मांगीलाल राठोड, सातव, गजानान अंभोरे, सरला इंगळे यांचेसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.